अव्यक्तापेक्षा श्रेष्ठ जे तत्त्व आहे ते पुरुष आहे, म्हणजे ते साकार आहे.
परंतु अव्यक्तापेक्षा व्यापक आणि आकाररहित परमपुरुष श्रेष्ठ आहे. त्याला जाणून जीवात्मा मुक्त होतो आणि अमृतस्वरूप ब्रह्माला प्राप्त होतो
अव्यक्तापेक्षा श्रेष्ठ जे तत्त्व आहे ते पुरुष आहे, म्हणजे ते साकार आहे. साकार आहे इतकेच नाही तर ते व्यापक आहे. आता, जे व्यापक असेल ते साकार कसे होऊ शकते ? पुढे असे सांगितले आहे की ते अलिङ्ग आहे म्हणजे ते निर्गुण निराकार आहे. पुढे मंत्रात सांगतात की यं ज्ञात्वा, परंतु जर ते व्यापक असेल तर यं ज्ञात्वा कसे शक्य आहे? आणि पुन्हा हे निर्गुण, निराकार आणि व्यापक तत्त्व पुरुषाकार बनते. पुरुषाकार कुणाजवळ बनते? त्याच्याविषयी आपण विचार करत होतो.
गीता असे सांगते आणि उपनिषदही असेच सांगते की शेवटी निर्गुण निराकार स्वतःच व्यक्त होतो. तो पुरुषाकार होतो. साधना करणारा माणूस इथपर्यंत पोहोचतो. त्यानंतर वाटते भगवान कृपासाध्य आहे, त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. त्यामुळे हा निर्गुण निराकार स्वतःच व्यक्त होतो, पुरुषाकार होतो. पुरुषः होतो याचे नाव यं ज्ञात्वा. या ओळीचा अचूक अर्थ इथे बरोबर लागतो. यं ज्ञात्वा म्हणजे 'ज्याला जाणल्यावर, म्हणजे जाणणाऱ्यापेक्षा जे जाणायचे ते वेगळे असले पाहिजे. त्यामुळे आपल्यापेक्षा भगवान वेगळा असला पाहिजे. म्हणून भगवंताशिवाय आपले अस्तित्व असायला हवे. ही अव्यक्त, निर्गुण, निराकार, अलिंग चित्शक्ति पुरुषाकार बनून उभी राहाते. पण कुणाजवळ? पुरुषोत्तमाजवळ.
या जगात दैवी वृत्तीचे लोक आहेत तसे आसुरी वृत्तीचे लोकही आहेत. चित्शक्ति, जो पुरुषोत्तम आहे त्याच्याजवळ व्यक्त बनून उभी राहाते. परंतु पुरुषोत्तम कोण याचा विचार आपण गेल्या वेळी करत होतो.
आपल्याला असे वाटते की जो धार्मिक माणूस आहे तो पुरुषोत्तम आहे. धर्माधर्माचा विचार करून योग्य पद्धतीने वागणारा, असा जो धार्मिक माणूस तो पुरुषोत्तम असायला हवा ही खरी गोष्ट आहे. परंतु एवढ्यातच पुरुषोत्तमत्व पूर्ण होत नाही. कारण अशा रीतीने चालणे हे स्वर्गार्थ अथवा पुण्यार्थ होते आणि स्वर्गार्थ व पुण्यार्थ पुंजी जर वापरून टाकली तर विकासार्थ काही उरत नाही. त्यामुळे प्रत्येक धार्मिक माणूस उच्च स्थितीला पोहोचेल अशी स्थिति नाही. जो धार्मिक आहे तो पुरुषोत्तम आहे परंतु केवळ धार्मिक असून चालत नाही. दुसरा पुरुषोत्तम कोण आहे? तर या जगात जसा धार्मिक माणूस पुरुषोत्तम आहे तसा शक्तिशाली माणूसही आहे. माणसाजवळ शक्ति असायला हवी. आपल्याजवळही शरीरशक्ति असली पाहिजे.
भारतीय युवान शक्तिशाली असला पाहिजे. उत्तररामचरितामध्ये एका प्रसंगात लवाच्या मदतीसाठी धावत येणाऱ्या कुशाला समोरून येताना पाहून भगवान रामचंद्र म्हणतात---
किती सुंदर चित्रण केलेले आहे. प्राचेतसांसारख्या ऋषींच्या आश्रमात काय शिक्षण मिळत असेल याचा विचार करा. केवळ प्रेम करा, करुणा ठेवा, एवढ्याच शिक्षणामध्ये मानव जीवनाचा विकास नाही. शौर्य, तेज आणि भाव याचे शिक्षणही बालपणापासून मिळायला हवे आणि ते जर मिळत नसेल तर शिक्षणात कमतरता आहे. मानवजीवनाचा अर्थच समजले नाहीत. समाजात अशी अर्धवट माणसे तयार झाली म्हणजे जीवनाचे upliftment (ऊर्ध्वकरण) झाले आहे असे नाही म्हणता येणार.
प्राचेतसांच्या आश्रमात शिकणारा लव आहे. लव जेव्हा समोरून येतो तेव्हा त्यांना वंदन करतो. राम दृष्टिस्तृणीकृत जगत्त्रयसत्त्वसारा..... दर्प एव असे म्हणतो. राम आश्रमात शिकणाऱ्या कुशाचे वर्णन करताना म्हणतो: 'साक्षात वीररसच माझ्यासमोर येत आहे की काय?' वाल्मीकींना ही मुले प्रिय आहेत. वाल्मीकि ते ज्यांनी रामायण लिहिले होते. दृष्टिस्तृणीकृत - हा मुलगा जो समोरून येत आहे त्याच्या डोळ्यांमध्ये असा भाव दिसत आहे की जगाचे वैभव त्याला गवताच्या तृणाप्रमाणे भासत आहे. जगत्त्रयसत्त्वसारा याचा अर्थ करत बसत नाही. वाल्मीकि लिहितात की धीरोद्धता नमयतीव गतिर्धरित्रीम् एक एक पाऊल असे टाकत आहे की जणु धीरोद्धता नमयतीव गतिर्धरित्रीम् धरतीला नमवतोय की काय असे वाटावे. कौमारकेऽपि - याचा अर्थ असा की हा लहान बालक नाही तर गिरिवद्गुरुतां कुमारासारखा आहे, तरीही पर्वतासारखे स्थैर्य आणि त्याच्यात दिसते आहे. साक्षात वीररसच येत आहे की काय ? गुरुत्व
मुलांना चांगले शिक्षण द्यायचे म्हणजे काय ? चांगले शिक्षण मिळणे ही जीवनाची खूप मोठी व्यथा आहे. अमुक करायचे आणि अमुक करायचे नाही, एवढेच शिक्षण काही पुरेसे नाही. जीवनात इतरही अनेक गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत. जीवनात वीररस असायला हवा, पौरुष असायला हवे, शक्तीची उपासना जीवनात व्हायला हवी, ही मोठ्यातली मोठी गोष्ट आहे.
जीवनात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीची उपासना आपल्याला सांगितली आहे, ती उपासना व्हायला हवी. माणसाला या जगात राहायचे असेल तर अशापद्धतीने राहावे लागेल.
वाल्मीकींनी लवकुशांमध्ये वीररसच भरलेला आहे. पण ऋर्षीपेक्षा आपण स्वतःला शहाणे समजायला लागलो. वीररस तर असायलाच हवा. दृष्टिस्तृणीकृत जगत्त्रयसत्त्वसारा जगाचे वैभव तुच्छ वाटायला हवे. डोळ्यांमध्ये तेजस्विता आणि निःस्पृहता असली पाहिजे. जगाचे वैभव तुच्छ केव्हा वाटेल? त्यासाठी डोळ्यांत तेजस्विता आणि निःस्पृहता असली पाहिजे. जीवनात लाचारी, आशाळभूतता येतेच कशी? त्यासाठीच ऋषींनी महाकालीची उपासना सांगितली आहे. शक्तीचा उपासक हा मोठा माणूस आहे. त्यामुळे तो पुरुषोत्तम आहे. शक्ति असलीच पाहिजे. शारीरिक शक्ति असलीच पाहिजे. एवढेच नाही, जग माणसांच्या सद्वर्तनावर चालत नाही तर बळावर चालते. मी जे सांगतो आहे ते असेच सांगत नाही, हा वैदिक सिद्धांत आहे. मी वैदिक सिद्धांताचे भाषांतर सांगतो आहे. जग जे चालते आहे ते माणसाच्या सद्वर्तनामुळे नाही तर त्याच्या बळामुळे चालते आहे. इतरांचा पराभव करून जगणे हा श्रेष्ठ धर्म आहे. माझ्यावर सतत अन्याय होईल, अत्याचार होईल, हल्ला होईल. त्याविरुद्ध मला लढावेच लागेल. ही 'सत्'ची उपासना आहे. 'भगवान मला वाचवा' असे म्हणणारा 'सत्'चा उपासक तर नाहीच तर लुच्चा माणूस आहे. 'सत्'चा उपासक वेगळा असतो. म्हणून बळ पाहिजे.
जीवन हे मंदिर आहे यात शंका नाही कारण त्याच्या आत भगवान बसलेला आहे. जीवन फक्त मंदिर नाही, ते रणांगणही आहे. त्यामुळे रणांगणावर गीता सांगितलेली आहे. काय औचित्य आहे! भगवंताने किती योग्य जागा शोधून काढली. कृष्ण किती महान आहे. त्याला जर भगवान समजलो तर तो सर्वज्ञानी आहेच. जे लोक त्याला भगवान समजत नाहीत त्यांनासुद्धा तो अतिशय कुशाग्र बुद्धीचा वाटतो. रणांगणात आल्यावर अर्जुनाची
अशी स्थिति होईल असे नक्कीच भगवंताने forecast (भाकित) केले असेल. वास्तविक दिवाणखान्यात बसून निवांतपणे गीता ऐकवून मगच रथ रणांगणात घेऊन जायला हवा होता. परंतु त्याने तसे न करता प्रवृत्ते शस्त्रसम्पाते अशा दोन सैन्यांच्या मध्ये उभे केले आणि गीता सांगितली आहे. गीता रणांगणात सांगण्यात आली याचे कारण जीवनसुद्धा एक रणांगण आहे. शौर्याने, वीर्याने, धैर्याने, हिमतीने जीवनात उभे राहिले पाहिजे, अशाप्रकारचे शिक्षण जर नाही मिळाले, अशाप्रकारची विचारधारा जर नाही मिळाली तर शिक्षण व्यर्थ. तसे शिक्षण देणारे खोटे तसेच अशा समाजातले श्रेष्ठीही खोटे ! त्यामुळे जीवनात शक्ति पाहिजे.
वसुंधरा कोण उपभोगू शकतो? वीर भोग्या वसुन्धरा । वीरच ती उपभोगू शकतात. या जगात जगू कोण शकतो? तसे तर गांडुळही जगत असते आणि छगनही जगत असतो. शक्ति उपासनेशिवाय जीवन अशक्य आहे. म्हणूनच वीर भोग्या वसुन्धरा । म्हणतात. शक्ति उपासना व्हायला हवी. या जगात तुमचे तत्त्वज्ञान कोणतेही असू द्या त्याच्या मागे powerful शक्ति असली पाहिजे. कारण शक्ति ही भगवद्रूप आहे. जबरदस्त शक्ति असली पाहिजे तरच ते तत्त्वज्ञान उभे राहील.
जर थोडा विचार केला तर रशिया आणि चीन हे दोन्ही देश जंगली संस्कृतीचे देश आहेत. ते लोक क्रूर आहेत, अत्याचारी आहेत. एक एक plan उभा करताना पन्नास-पन्नास लाख लोकांना मरणाच्या दारात नेतील अशी माणसे आहेत. वास्तविक या आसुरी व जंगली संस्कृतीला घाबरण्याचे काही कारण नाही कारण की, जंगली व आसुरी संस्कृति जगाच्या इतिहासात उभी राहिलेली नाही.
रशियामध्ये नवीन मूल्यांची उपासना दिसतच नाही. सहृदयता, समता, बंधुता यांसारख्या नव्या मूल्यांची उपासना तिथे दिसत नाही परंतु नवशक्तीची उपासना नक्कीच आहे. 'How Russia became strong'
आणि 'Science of Technology in Modern warfare' ही दोन्ही पुस्तके वाचण्यासारखी आहेत. त्यात मानवी स्वभाव आणि जगातील चिरंतन सत्यांचा अभ्यास आहे.
या जंगली संस्कृतीच्या देशांची अमेरिकेसारख्या देशांनी भीति बाळगण्याची बिलकुल गरज नाही. परंतु अमेरिकेचे जे बुद्धिमान लोक आहेत ते कधी घाबरले असतील? व्यक्तिस्वातंत्र्यामुळे विज्ञान वाढते आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर जेव्हा गदा येते तेव्हा विज्ञान वाढत नाही. १९५७ मध्ये रशियाने हायड्रोजन बॉम्ब आकाशात फोडला त्या दिवशी त्याची गंभीर नोंद अमेरिकेने घेतली. भारताच्या वृत्तपत्रांनी ती नोंद गमतीच्या स्वरूपात घेतली. तात्पर्य हे आहे की ही घटना शक्ति उपासनेच्या बाबतीतली जागरूकता दाखवते आहे. ज्या ठिकाणी व्यक्तिस्वातंत्र्य दाबले जाते तिथे विज्ञान राहात नाही. वास्तविक व्यक्तिस्वातंत्र्य असेल तिथेच सृष्टीची रहस्ये खुली होतात. बंधनातली व्यक्ति कधीही सृष्टीच्या जवळ पोहोचू शकत नाही, जाऊ शकत नाही. सृष्टि अशा व्यक्तींजवळ स्वतःची रहस्ये खुली करत नाही. परंतु ज्या रशियामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याला पायदळी तुडवले गेले आहे तिथे सुद्धा विज्ञान वाढलेले आहे. जाऊ द्या. हा खूप विचार करण्यासारखा विषय आहे.
या जगातील कोणताही विचार मग तो आस्तिकतेचा असो वा नास्तिकतेचा असो, ज्याच्यामागे तप व शक्ति आहे तो विचार उभा राहाणार, टिकणार. अशाप्रकारे दोन गोष्टी असल्या पाहिजेत तप आणि शक्ति. अर्थात शक्ति मिळवण्यासाठी तपाची आवश्यकता आहे. अशाप्रकारे रशिया-अमेरिकेसारख्या देशांनी शक्ति उपासनेसाठीचा मूलभूत अभ्यास केला. आमच्या वेदव्यासांनी तर त्यांच्यापेक्षाही फार पूर्वीच हा अभ्यास केला होता. शांतीचे सूक्त गाणारे वेदव्यास, ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिणारे वेदव्यास, जगात सर्वांमध्ये भगवंताला पाहाणारे वेदव्यास, फक्त माणसांमध्येच नाही तर कृमिकीटक, जड़-चेतन सर्वांमध्येच भगवंताला पाहाणारे असे वेदव्यास, ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः चा जीवनात विचार करणारे वेदव्यास होते. हे
वेदव्यास महाभारतात पांडव जेव्हा जंगलात जातात तेव्हा म्हणतात--


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा